Breaking News

लक्षणे दिसताच चाचणी करा

Nagpur Today : Nagpur News

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. यग्नेश ठाकर व डॉ. अविनाश वासे यांचे आवाहन

नागपूर : कोरोना हा आजार सर्वसामान्यांप्रमाणेच डॉक्टरांसाठीही नवीन आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनातून त्याचे बारकावे लक्षात येत आहे. मात्र या आजाराविषयी गंभीर राहणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने काळजी घेणेही अत्यंत गरजेचे आहे. साधा ताप, सर्दी असली तरी कोव्हिडचा अहवाल पॉझिटिव्ह येतो अशी अनेकांची तक्रार असते.

कोव्हिडचे वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येकाला सारखी लक्षणे राहतील असे नाही. त्यामुळे साधा ताप असला तरी डॉक्टर चाचणी करायला सांगतात हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. प्रत्येक ताप हा कोरोना असू शकत नाही हे खरे असले तरी त्याचे योग्य निदान करण्यासाठी चाचणी करणे गरजेचेच आहे. त्यामुळे कोव्हिडच्या तीव्र लक्षणांव्यतिरिक्त कोणतिही सौम्य लक्षणे आढळली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्वरीत चाचणी करा. चाचणी करून योग्य निदान लागल्यास आपल्याला आवश्यक ती काळजी घेता येईल आणि स्वत:सह इतरांचेही संरक्षण करता येईल, असे आवाहन प्रसिद्ध कन्सल्टंट मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. यग्नेश ठाकर आणि प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. अविनाश वासे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ मध्ये गुरूवारी (ता.१७) कन्सल्टंट मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. यग्नेश ठाकर आणि प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ.अविनाश वासे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी सुक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. यग्नेश ठाकर यांनी कोव्हिड संदर्भातील चाचण्या आणि त्यातील बारकाव्यांची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘टेस्ट, ट्रेस आणि ट्रीटमेंट’ हे तीन ‘टी’ महत्वाचे आहेत. कोव्हिड रुग्णाचे योग्य निदान व्हावे यासाठी सर्वात आधी चाचणी करणे आवश्यक आहे. कोव्हिड संदर्भात अँटीजेन, आरटीपीसीआर आणि अँटीबॉडी या तीन चाचण्या केल्या जातात.

या चाचण्यांमध्ये कोरोनाचा ‘आरएनए’ शोधला जातो. तो रुग्णामध्ये आढळल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असतो. आजच्या स्थितीत अँटीबॉडी चाचणीचे फारसे महत्व नसल्याने ती न केल्यास फरक पडत नाही. सुक्ष्म निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. याशिवाय झटपट निदान व्हावे यासाठी अँटीजेन चाचणी केली जाते. अँटीजेन निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी १७ दिवसाचा आयसोलेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना चाचणीची गरज नाही. कोरोनाबाधितांच्या शरीरात मृत विषाणूचे तुकडे राहतात, रुग्ण बरे झाल्यानंतर पुढील २८ दिवसात आरटीपीसीआर ही सुक्ष्म स्तरावरील चाचणी केल्यास त्यात ते तुकडे निदर्शनास येउन अहवाल पॉझिटिव्ह येउ शकतो. त्यामुळे बाधित व्यक्तीला धोका नसला तरी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. यग्नेश ठाकर यांनी यावेळी सांगितले.

डॉ.अविनाश वासे म्हणाले, कोव्हिडमध्ये ‘अँटीजेन’ हे खूप जास्त प्रमाणात ‘ॲक्टिव्ह’ होत असून त्याचा प्रभाव फुफ्फुस, किडनी, यकृत यावर पडतो. कोव्हिडचे प्रमाण किती व त्याचा धोका कितपत आहे यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या ‘सीबीसी’, ‘लिव्हर फंक्शन’, ‘किडनी फंक्शन’ यासह इतर आवश्यक चाचण्या करणे गरजेचे आहे. कोव्हिड संदर्भात नागरिकांमध्ये भीती आणि त्यापेक्षा जास्त संभ्रम आहे.

साध्या तापामध्ये लोक भीती बाळगतात आणि चाचणीसाठी पुढे येत नाही. जसा प्रत्येक ताप हा डेंग्यू, मलेरिया, टायफाईड असू शकत नाही तसाच प्रत्येक ताप हा कोरोना सुद्धा असू शकत नाही. मात्र धोका टाळण्याठी चाचणी करणे आवश्यक आहे. मित्र, नातेवाईक, कार्यालयात वावरताना अनेक जण मास्क व इतर सुरक्षा घेत नाही. कोरोनाला कुणालाही होउ शकतो त्यामुळे जवळच्या व दूरच्या प्रत्येक व्यक्तीपासून योग्य अंतर राखा, नियमीत मास्क लावा, सॅनिटायजरचा वापर करा. ‘लवकर निदान, त्वरीत उपचार’ हा कोव्हिडला हरविण्याचा सर्वोत्तम मंत्र आहे. त्यामुळे लक्षणे लपवू नका, चाचणी करा. कोणतिही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ही मास्क लावा व समाजात जे लोक मास्कविना फिरत आहेत, त्यांनाही लावण्याचा सल्ला द्या, असेही डॉ. अविनाश वासे यांनी सांगितले.

लक्षणे दिसताच चाचणी करा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Ed6REq
via

No comments